फिटे अंधाराचे जाळे-सूरांची कथा
फिटे अंधाराचे जाळे-सूरांची कथा

फिटे अंधाराचे जाळे-सूरांची कथा

फिटे अंधाराचे जाळे-सूरांची कथा
नावाजलेले संगीतघराणे
गाण्याचा विषय निघाला कि सारंग कोरडकर यांचे नाव निघाले नाही असे होत नाही.
सारंग
जन्मतःच आईवडिलांकडून गाण्याचा वारसा मिळालेला आणि त्यासाठी स्वतःला नशिबवान समजणारा  सारंगआज मात्र असहाय होऊन त्याचे सोबती तबला,पेटी,सतार यांच्याकडे हताशपणे बघायला लागले.
हा तबला कधी केहरवा कधी तीन ताल तर कधी रुपक…ठेका आणि लय यात कधीही न चुकणारा.

ही पेटी काळी चार लावा कि सफेद एक नेहमी आनंदाने साथ दिली.

 

सतार म्हणजे सारंगचा वीकपाॕईंट.ती शिकायला त्याला खूप परिश्रम करावे लागले. बोटातून शिकताना रक्तही यायचे.पण शिकण्याची जिद्द कायम राहीली.
हळूहळू बोटांना सवय झाली आणि ती सतारवर सराईतपणे फिरु लागली.
मल्हार आणि मीराचे सारंग एकुलते एक अपत्य.
मल्हारही गायन आणि वादनात तरबेज. आणि त्यात त्यांना साथ मिळाली मीराची.एका गाण्याच्या मैफिलीत दोघे भेटले,प्रेमात पडले आणि लग्न केले. कथा
दोघांच्या संसारात बाळाने प्रवेश केला.
सारंग–एका रागाचे नाव ठेवले.

सारंग जन्माबरोबरच सुर,लय,ताल आणि मधूर कंठ सोबत घेऊन जन्मला.
मल्हार आणि मीरासारखे आईवडील असल्यावर त्याच्यावर संगिताचे संस्कार होणे ओघानेच आले.
मल्हारला तबला,पेटी आणि गाणे यावर हुकमत होती.पण मैफिली सजवण्यापेक्षा आपला गुण मुलांना वाटणे त्यांना अधिक आनंददायी वाटायचे म्हणून सारंग तीनएक वर्षाचा झाल्यावर त्यांनी क्लासेस सुरु केले.
क्लासमध्ये चिमुकला सारंगही येऊन बसू लागला.


सुरांची जन्मतःच जाण असलेला सारंग गाण्याचे पाठ गिरवू लागला.हळूहळू तबल्यावरही त्याची थाप पडू लागली.
मल्हार मीरा त्याला वेगळे काही शिकवायचे नाहीत.जे क्लासमध्ये शिकवल्या जाई तेवढेच.पण रक्तातच संगीत असलेल्या सारंगला तेवढे शिक्षण पुरेसे होते.
काही दिवसांनी सारंगने पेटी वाजवायला सुरूवात केली.
काही वर्षातच तबल्याचे तार आणि पेटी आणि गायकीतले राग,ताना त्याच्या तोंडपाठ झाल्या. लीलया तो पेटीवर हात फिरवू लागला.त्याने पेटीवर हात ठेवला कि त्यातून मधूर स्वर बाहेर पडायचेच. तेच त्याच्या गळ्याचे तीव्र,शुद्ध,कोमल सगळे स्वर जसे हवे तसेच गळ्यातून बाहेर पडायचे.

मीरा,मल्हारला विलक्षण प्रतिभेचा धनी  असलेल्या सारंगचे खूप कौतुक वाटायचे.
छोटा सारंग आईवडीलांची मधूर गाणी,भीमसेन जोशींचे
माझे माहेर पंढरी आणि कुमार गंधर्वांचे ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी….गाणी ऐकत मोठा होत होता.
मल्हारला तबला,पेटी आणि गाणे येत होते.पण सारंगने दुसऱ्या गुरुकडे जाऊन गिटार आणि सतारचे धडे घ्यायला सुरूवात केली.
सोबत शालेय शिक्षणही सुरु होते.पण ते जेमतेम पुढील इयत्तेत जाण्यापुरते.
सारंगला खरी ओढ संगिताचीच होती.
एकदा ताल,सुरांच्या दुनियेत तो गेला कि तिथेच तल्लीन व्हायचा.आजूबाजूला काय सुरु आहे कसलेच भान उरायचे नाही त्याला.
दिवस पुढे पळत राहिले. मल्हार- मीरा आता थकले. क्लासमध्ये शिष्य वाढतच चालले होते. तेवढ्यांना सुरांची जादू देणे अशक्य होते.
सारंग आता मोठा झाला. आवडणारी सगळी वाद्य वाजवण्यात निपूण झाला. त्याला स्टेज शो साठी बोलावणे येऊ लागले पण तो आईवडीलांना सुरांचा ठेवा वाटतांना मोठा झाला होता.
त्यानेही आता तेच काम करायचे ठरवले. सुरांच्या जादूत त्याला मिळणाऱ्या धुंदीने त्याला इतरांनाही धुंद करायचे होते.
सारंगला विशेष लळा गाणे आणि सतारचा होता.
सतारवर त्याची बोटे फिरु लागले कि ऐकणारा देहभान विसरायचाच.

लवकरच सारंग मुलांचे आवडते सर बनला.
त्याच्या शिकवण्याच्या हातोटीत सुरांइतकेच माधूर्य होते.
मुलांची संख्या दिवसागणिक वाढतच होती.
मल्हार आणि मीरा आता मोजक्याच मुलांचे क्लास घेत होते.


सारंगचे मेधाशी लग्न झाले. मेधाला गाणे गाता येत नव्हते पण गाणे समजायचे तिला.
सारंगचे सूर तिच्या ह्दयाच्या आत उतरायचे.
सारंग-मेधाच्या आयुष्यात छोटी परी आसावरी आली.
आसावरी सारंगपेक्षा मेधावर जास्त गेली.
तिला गाण्यापेक्षा गणित अधिक आवडत होते.


आजी-आजोबांनी तिला सुरांशी ओळखा होण्यासाठी प्रयत्न केला.पण व्यर्थ.
आसावरी मोठी होत होती.सारंगची शिक्षक म्हणून लोकप्रियता वाढत होती.
मल्हार-मीरा म्हातारे झाले,दोघेही एकेक करुन सोडून गेले.
सारंगचे तर सूरच हरवले काही दिवस.मेधा आणि सारंगचे शिष्य यांनी परत त्याला संगिताच्या जादूई नगरीत वापस आणले.

सारंगकडे शिकायला वीस बावीस विभावरी यायची. गाण्याची जाण असणारी.सारंगसारखीच सुरांच्या जादूई नगरीत देहभान हरपणारी.
हळूहळू ती सारंगमध्ये गुंतत गेली.
सारंग गात असला कि वेडी व्हायची ती.


सारंगचेही बंध जुळले काही काळ,पण मेधाशी प्रतारणा नाही करु शकला जास्त काळ.माधूरी क्लास सोडून निघून गेली.
आसावरी मोठी होत होती. अभ्यासात हुशार आसलेली आसावरी शिक्षण पूर्ण करुन दुसऱ्या शहरात नौकरीला लागली.
तिथेच तिच्या आयुष्यात भार्गव आला. आसावरीवर सारंगचा पूर्ण विश्वास असल्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता.
आसावरीचा वेगळा संसार सुरु झाला.


सारंग आणि मेधा घरी आता दोघेच होते. सारंग दिवसभर क्लासेसमध्येच व्यस्त असायचा.
त्याचा श्वास,त्याचा ध्यास म्हणजे त्याचे संगीत.
आसावरी,भार्गव यायचे सारंग,मेधाला भेटायला.
भार्गवला सुरांची जाण होती.तो आला कि दिवसभर सारःगच्या क्लासमध्ये बसायचा.
आणि रात्री सारंग त्याच्यासाठी मैफिल रंगवायचा.
यमन,भैरवी,मालकंस सारंगला आवडणारे राग आणि बंदिशी तो आळवायचा.
बिहागा रागाचा ख्याल त्याला आवडायचा.
देखो सखी कन्हैया रोके…..

आसावरी-भार्गवच्या संसारात लेकीचे आगमान झाले,सारंग आजोबा बनला.
भार्गवने लेकीचे नाव ठेवायचा अधिकार सारंगला दिला.
सारंगने तिचे नाव भैरवी ठेवले.
भैरवी सारंगावर गेली. गाण्याची गोडी होती तिला.
ती आली कि आजोबा मला गाणे शिकवा म्हणून हट्ट धरायची मग आजोबाही
पाऊस पहिला जणू कान्हूला…….शिकवायचे तिला.

एकदा घरी दोघेच असतांना मेधाला ह्दयविकाराचा झटका आला आणि दवाखान्यात पोहचण्याआधीच मेधा गेली.
सारंग एकटा पडला.
जिच्यासाठी आयुष्यात येणाऱ्या मोहांवर सारंगने विजय मिळवला होता तीच त्याला एकटे सोडून गेली.

आसावरी,भार्गव भैरवीला घेऊन काही दिवस थांबले पण त्यांनाही आपापली कामे होती.

आता क्लास संपला कि तो एकटाच असायचा घरात.
आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्यावर ही वेळ आली होती. याआधी एकटा तो कधी राहीलाच नव्हता.
क्लास संपल्यावर मेधाशिवायचे घर त्याला नको त्या आठवणी आठवायला लावायचे.

अशातच त्याला पॕरालिसिसचा अटॕक आला नी त्यात शरीराची एक बाजू पूर्ण निकामी झाली.
एका दिवसात त्याचे आधीचे आयुष्यात भूतकाळात जमा झाले.
आसावरी आली लगेच पण सारंग आता तसाच राहणार होता.
चालू शकत नव्हता,बोलू शकत नव्हता.
कूलास घेणे बंद करावे लागले.
तबला,सतार,पेटी यांना गोंजारु शकत नव्हता.
आणि गळ्यातून त्याचे आवडते स्वर काढू शकत नव्हता.
त्याचे आयुष्य असलेले संगीत त्याला सोडून निघून गेले.अचानक,अकल्पितपणे.
आयुष्यातील सगळे सूर संपले होते.

आसावरी ,भार्गवने त्याला त्यांच्यासोबत राहण्यासाठी आग्रह केला पण सारंग आई,बाबा,मेधा ,त्याचे संगीत …यांच्या आठवणी सोडून जायला तयार नव्हता.
ते दोघेही सारंगला भेटायला नेहमी येत होते. भैरवीला तिची शाळा,अभ्यास यामुळे यायची नाही.

आसावरीने सारंगसाठी दिवसभर राहील असा मुलगा ठेवला.
क्लासची मुलेही सरांना भेटायला यायची.पण सरांची अवस्था त्यांना बघवत नव्हती.हळूहळू त्यांचे येणेही बंद झाले.
सारंग दिवसभर खिडकीकडे तोंड करुन लेटून राहायचा.
मी आता कधीच गाऊ शकणार नाही …ही कल्पना त्याला मृत्यूपेक्षाही भयंकर वाटायची.पण सत्य तेच होते.

त्याने शरीरापेक्षा मनाची उमेद हरवली होती.
डाॕक्टरनेही तेच सांगितले.सारंगच्या मनाला उभारी आल्याशिवाय त्याच्या तब्येतीत सुधारणा अशक्य होती.
सुरांची साथ मिळाल्याशिवाय सारंगचे जगणे जगणे नव्हते.
आसावरीला वडिलाची अवस्था बघून खिन्नता यायची.
मी जर सुरांना जवळ केले असते तर…..बाबांची अवस्था वेगळी राहली असती…असा विचार आला की ती आवंढा गिळायची.

मी मी नाही जगू शकणार गाण्याशिवाय. माझे सूर माझा श्वास आहेत….असे विचार करता करता सारंगच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.
दारावरची बेल वाजली…त्याला सांभाळणाऱ्या
मुलाने दार उघडले.सारंगने मान वळवून बघितले समोर आसावरी उभी होती. सोबत भार्गव आणि भैरवीही होते.
भैरवी पेटी जवळ गेली.पेटीचा बाजा उघडला आणि मालकंसची सुरावट सुरु केली…
आरोह,अवरोह,स्थायी,अंतरा…भैरवी पुढे पुढे जात राहीली.
ग,ध,नी कोमल,रागाचे रुपही कोमल.
सारंगच्या डोळ्यात अश्रु जमा झाले. पण अश्रुंसोबत चमकही दिसली.
खूणेनेच सारंगने विचारले
कुठे शिकली?
आसावरीने सारंगच्या टेपस् बॕगमधून काढून दाखवल्या.
बाबा ह्या टेपस् ऐकून शिकली भैरवी.
भैरवी आजोबांना जाऊन बिलगली.
आसावरी आणि भैरवी आता काही दिवस सारंगजवळच थांबल्या.

भैरवी रोज पेटी काढायची..
भूपाली,यमन,भीमपलासी,मालकंस….वाजवून दाखावायची

इतन जोबन पर…
लखछबी सावरीयाकी
बंदिशी गाऊन दाखवायची

सारंगच्या तब्येतीत सुधारणा होत होती.
सूरांनी चमत्कार दाखवायला सुरुवात केली.
त्याच्या हातापायात ताकद आली.
हळूहळू भैरवीच्या मदतीने पेटी आणि तबल्यावर हात फिरायला लागले.
पण गळ्यामधून सूर उतरत नव्हते.
ते काम भैरवी करत होती.
सारंग पेटीवर साथ द्यायचा आणि भैरवी गाऊन.
सारंगने पेटी आणि तबल्याचे क्लासेस पुन्हा सुरु केले.

सारंगचे घर पुन्हा अलवारपणे सुरांमध्ये न्हाऊन निघत होते.सारंगचे सूर परत मिळाले.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
 
Email
whatsapp no,
9867408400
 
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
 
 

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

 
 
 
 
 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!