मराठीअपराधकथा – जीवघेणी स्पर्धा
मराठीअपराधकथा – जीवघेणी स्पर्धा

मराठीअपराधकथा – जीवघेणी स्पर्धा

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होऊन, त्यांचे सराव शिबीर पुण्यात चालू होते. सर्वजण ठरलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करत होते. अर्जुन हा ७४ किलो गटात खेळणारा आघाडीचा मल्ल होता. त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा कुस्ती शौकिनासह त्याच्या प्रशिक्षक व मित्रांना ही होती. तो ही जीव तोडून सराव करत होता…
पण त्या दिवशी सकाळ चे सराव सत्र सुरू झाले तरी तो मॅटवर आला नव्हता. हे तसे अनपेक्षित व अघटितच होते. प्रशिक्षक व मित्र त्याच्या होटेलातील रुमकडे गेले ,दार किलकिले होते. मित्राने थोडे ढकलून उघडले……….तर …..
सगळ्यांना मोठा धक्काच बसला अर्जुन गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता.
सगळीकडे गहजब उडाला…..
पोलिसांना पाचारण करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य आणि महत्त्व ओळखून इनस्पेक्टर प्रधानांकडे केस चा कार्यभार सोपविण्यात आला.

 

१०० मीटर धावणे ह्या क्रिडाप्रकारात ते स्वतः राज्यस्तरीय खेळाडू होते.
एक अतिशय चाणाक्ष तपास अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते,त्यांनी केस ची सुत्रे हातात घेऊन
लगेच तपासाला सुरुवात केली.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत होते. काही नोंदी करत होते.
ही आत्महत्या की घातपात?……

हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांना निकालात काढायचा होता.
अपेक्षांचे ओझे आणि त्यामुळे ढळणारा आत्मविश्वास……हे एक सबळ कारण आत्महत्येसाठी होते.
पण प्रशिक्षक आणि सहकारी मल्ल ती शक्यता धुडकावून लावत होते पण तसा ठाम निष्कर्ष काढण्यासाठी ठोस पुराव्याची आवश्यकता होती.
इतक्यात….प्रधानांचे लक्ष त्याचे मित्र पहात असलेल्या video कडे गेले……त्यांनी लगेच घटनास्थळाचे फोटो समोर घेतले……विचारचक्र वेगाने फिरू लागले………एका क्षणी टेबलवर हात आपटून ते उभे राहिले………ठामपणे म्हणाले……हा घातपातच….आहे…….. कारण अर्जुन हा left handed नव्हता…….मग …..गळफासाची गाठ त्याच्या डाव्या बाजूला कशी…….म्हणजेच

कोणीतरी दोरीने गळा आवळून आधी त्याचा खून केला…..आणि मग त्याला इथे लटकवले…………
आणखी एक म्हणजे…..त्याच्या सारख्या मल्लाला काबूत आणणे एकट्याचे काम मुळीच नाही………म्हणजे गुन्हेगार दोन किंवा तीन असतील…….. मोठ्या खेळाडूचा खून……….तो ही पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात……..कोण असेल….खुनी………..वैयक्तिक हेवेदावे?……खेळातील जीवघेणी स्पर्धा??.. कि …काही…प्रेमप्रकरणं???

कॅलिडोस्कोप चांगलाच फिरू लागला होता……प्रत्येक मुद्यावर वेगळेच…..डिझाईन /अँगल समोर येऊ लागला.

पण प्रधान ही काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते…..त्यानी प्रत्येक मुद्याचा बारकईने तपास सुरू ठेवला…..
CCTV चे फुटेज मागितले असता……CCTV बंद असल्याचे सांगिण्यात आले…….बंद पडला ….की…बंद पाडला….??हे निवड समितीला माहीत होते का????असेल तर….हे हाॅटेल का निवडले…..???? कॅलिडोस्कोप पुन्हा एकदा फिरला….पुन्हा एक नविन डिझाईन …….एक टीम तो तपास करायला नियुक्त केली……

आणि ते काॅल रेकाॅर्ड चेक करू लागले….त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले नाही…….प्रशिक्षक व सहकारी खेळाडूचा जवाब घेतला…..पण सगळे अगदी जवळचे मित्र होते….आणि वेळापत्रकाप्रमाणे सर्वजण आपापल्या सरावासाठी उपस्थित होते…….म्हणजे….त्या अँगल मधेही काहीच आढळले नाही……….त्यांच्या डोक्याचा भुगा झाला होता…..
अचानक त्यांना वाटले…की हा कोणी सुपारी देऊन तर खून घडवून आणला असेल का????त्यानी अंडरवर्ल्ड मधले आपले खबरी कामाला लावले……..कोणती सुपारी मार्केटमधे फिरत होती का….हयाचा तपास केला….पण तशी काही कुणकुण लागली नाही…….केस खूपच अवघड होत चालली होती. जनतेचा आणी अधिकाऱ्यांचा दबाव वाढत होता……
CCTV ची माहिती काढण्यासाठी गेलेल्या टीम ने सांगितले कि CCTV संच ज्या दिवशी आला त्या दिवसापासूनच बंद होता ….पण त्याचाही खूप मोठा असा फाॅल्ट नव्हता…..तपास करणारऱ्या टीम ने technician ला बोलावले..तर त्याने लगेच तो दुरूस्त केला…..

ह्यात प्रधानांना काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला……हाॅटेल स्टाफला रिमांडवर घेऊन पोलीसी खाक्या दाखवावा असे त्यांना वाटले……पण…सबळ पुराव्या अभावी तसे करणे पोलिसांच्या प्रतीमेला मारक ठरले असते…….
अशाच विचारात…..ते घटनास्थळी वावरत होते…..तिथेच बाजूला एका हाॅटेलात चहा घेत असतानाच…..त्यांच्या नजरेला…..त्या हाॅटेलातील CCTV पडला………त्याचा फोकस…….संघाच्या हाॅटेल कडे होता………
त्यानी ताबडतोब त्याचे फुटेज पाहीले……….त्यात दोन रेकाॅर्डवरचे गुन्हेगार दिसले………हे इथे काय करत आहेत……….आणि आसपास तर कोणती……जबरी चोरी…….लूटालूट……असे काहीच घडले नव्हते………असे कसे?……हे अट्टल गुन्हेगार इथे आले आणि काहीच घडले नाही………का घडून गेले आणि आपल्याला कळाले नाही..?…….मग हे दोघे काय फक्त तुळशीबागेत फिरायला पुण्यात आले होते का???????

त्यानी लगेच आपल्या टिमला सावध केले आणी त्यांना उचलण्याचे आदेश दिले……..दोनच दिवसात……सांगलीतून त्यांना अटक केली………आणि प्रधानांसमोर ऊभे केले…………..
सुरूवातीच्या चौकशीत त्यांनी काहीच ताकास तूर लागू दिला नाही………..ते पाहून हवालदार कांबळे म्हणाले

साहेब….मी ह्यांचे थोडे चहापाणी करतो……..तसे ही सकाळ पासून त्यांनी काहीच खाल्ले नाही………….

असे म्हणून ते त्यांना आत घेऊन गेले…………..झाले ……अर्ध्यातासात……..कांबळे परत आले………ते जवाब देण्यासाठी तयार होते………………

जबाबात जी माहिती समोर आली…..ती अतिशय धक्कादायक होती………

लगेच ते कमिशनर साहेबांना भेटले………एका मोठ्या माणसाचा अटक वाॅरंट घेऊन ते लगोलग दिल्लीला रवाना झाले……..

दुसऱ्या दिवशीच्या पेपर मधे हेडलाईन झळकली…………

साखर कारखान्याचे माजी चेअरमन…..आणि कुस्ती महासंघाचे सदस्य…..देवरूखे…..यांना….मल्ल अर्जुन च्या खुनाच्या आरोपाखाली अटक……..

त्या पत्रकार परिषदेत प्रधानांनी खुलासा केला……..

एका प्रतिस्पर्धी देशातील उद्योगपतीने….आपल्या देशाला सुवर्णपदक मिळावे म्हणून…..देवरूखेंना……भली मोठी रक्कम देऊन……अर्जुन चा काटा काढण्यास सांगितले………..

आणि त्यांनी तो कट ….ह्या दोन अट्टल गुन्हेगारांना हाताशी धरून पूर्णत्वास नेला होता.
त्यांच्याच माणसाने CCTV बंद पाडला होता…….त्याला ही पकडले होते…….

जरी ह्या हाॅटेल चे CCTV बंद केले तरी…..समोरच्या हाॅटेल च्या CCTV ने आपले काम चोख बजावले होते………..आणि जोडीला प्रधानांची तीक्ष्ण नजर……..गुन्हेगार तर पकडला जाणारच होता……पैशाच्या हव्यासापायी…..देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले होते….
अर्जुन सारखे मल्ल एका रात्रीत तयार होत नसतात……

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!