मराठी कविता घाल..घाल.. पिंगा वाऱ्या
मराठी कविता घाल..घाल.. पिंगा वाऱ्या

मराठी कविता घाल..घाल.. पिंगा वाऱ्या

मराठी कविता-घाल घाल पिंगा वाऱ्या

 

घाल घाल पिंगा वाऱ्या
माझ्या परसात….
माहेरी जा …
सुवासाची कर बरसात…
खूप जुनी कविता.कृ..ब..निकुम्ब यांची भावनाप्रधान कविता…
तो काळ म्हणजे स्त्रीला बंधनात अडकून ठेवण्याचा.

तिने फक्त चूल आणि मूल यातच धन्यता मानायची.. बाकीच्या जगापासून अलिप्त राहायचे..

तो जुना काळ..मुलींची कोवळ्या वयात लग्न केले जायचे.अल्हड वय.. फोन नसायचे त्या काळी.. मुलींना शिक्षणाचा गंध नाही.. कुणी आल्याशिवाय माहेरी जायचे नाही हा दंडक..सणावाराला भाऊ घेऊन जाईल..तेव्हा तिला माहेरी जायला मिळायचे..मध्ये आई भावाची आठवण आली तरी ती जाऊ शकायची नाही.
अशा वेळी तिचे मन गहिवरून येत होते. माहेरची ओढ तिला व्याकूळ करायची. माहेरच्या आठवणी अस्वस्थ करायच्या. या स्त्री मनाची व्याकुळता एका पुरूषाने इतक्या अर्थपूर्ण..तरल शब्दात मांडावी याचे नवल वाटते.

माहेराला निरोप द्यायचा तर कसा द्यायचा?कुणीही जवळचे दिसत नाही.. तेव्हा वाऱ्याला सखा बनवून त्यालाच मनातील भावनांचा कल्लोळ सांगत बसते.. तिचे कातर मन व्यक्त करते. माहेरी जाऊन सुवासाची बरसात त्याने करावी असी तिची मनोमन इच्छा ….
परसात पिंगा घालून त्याने माहेरची खुशाली कळवावी हीच तिची अपेक्षा ….

कवी निकूंभ यांच्या कवितेतील स्त्री वाऱ्याला आळवणी करते..
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परि मन खंतावतं
विसरले का ग ..भादव्यात वर्ष झाल
माहेरीच्या सुखाला ग…मन आसवल

आईला पण सतत मुलीची काळजी.. कशी असेल ही चिंता
पण काय करणार?तो काळ रितीरिवाज सांभाळण्याचा.. मनातल्या भावना.. इच्छा याला कुठेही स्थान नव्हते. कार्य प्रसंगी आई मुलीकडे जायची.
तिला माहिती आहे माझी आई माझी आठवण करत असेल..काळजी करत असेल.. म्हणून वारा तिला जवळचा वाटतो.. निरोप देण्याचे काम त्याला सोपवून देते तुझी पोर सुखात आहे..कशाची कमी नाही..पण आई भावाच्या आठवणीने मनात आठवणीचे काहूर दाटतात.भादव्यात वर्ष झाले.. माहेराला नाही गेली.. मला विसरले तर नाही ना? अशा शंकेने तिचे मन गहिवरून जाते. माहेरच्या सुखाला मन आसूसले.. हृदयात माहेरच्या आठवणी दाटून आल्या.. ज्या घरात दुडदुड धावणारे बालपण गेले.. त्या घराला कोण विसरेल…

फिरून फिरून सय येई
जीव वेडावतो.
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो ..
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगनिया करी कशी गं बेजार

माहेरच्या आठवणीने जीव वेडा झाला आहे.कधी एकदा  माहेरी  जाते असे तिला  झाले आहे. ती श्रीमंत  घरात आहे. कशाची कमी नाही.  सुखात  न्हावून  निघत आहे..चंद्रकळा

  हा प्रकार  सुखवस्तू  घरातील  स्त्रिया  वापरायच्या.. माहेरच्या आठवणीत तिच्या अश्रूने चंद्रकळेचा पदर  भिजला.सतत माहेरची आठवणी  मनात  रूंजी घालतात. तिथले गाय.. वासरे.. डोळ्यासमोर येतात.
काळ्या कपिलेची नंदा किती  खोडकर आहे..आणि  ती सतत  तिच्या  जवळजवळ  घुटमळत राहायची.तिला  हुंगायची.. कशी बेजार करायची  हे तिला  आठवत आहे.
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी माय
माहेरच्या परसातील पारिजातकाचे झाड तिला  खुणावित आहे.  अंगणात  त्याचा सडा पडलेला दिसत आहे. लहानपणी  कितीतरी  वेळा तिने  तो सडा वेचला..
आताही तिला  तो सडा वेचायचा आहे.त्या फुलांच्या सुंगधात भिजायचे आहे. त्याच्या  मोहक सुगंधात रमायचे आहे. माहेरवरून कुणीतरी  लवकर  यावे याची वाट बघत आहे. कपिलेच्या दुधावर जशी मऊ दाट साय येते..तशीच माया  माझ्यावर  राहू दे..अशी आर्त हाक ती आईला देते.
आले भरून डोळे पुन्हा गळा ही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात…
माहेरच्या आठवणीने पुन्हा  तिचा गळा भरून  आला
आईच्या  भेटीसाठी तिचे मन व्याकूळ  झाले.. आता कधी भेट होईल या चिंतेने मनात  काहूर ऊठले.. पुन्हा  तिच आर्तता …प्रतीक्षा…तिच्या काळजाला चरे पाडत आहेत.
पुन्हा… पुन्हा .. वाऱ्याला आळवणी सुरू  आहे….
घाल..घाल…
पिंगा  वाऱ्या….. माझ्या  परसात
वरील कविता ऐकण्यासाठी खालील You Tube लिंक बघा
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

 

 

 

7 Comments

  1. Preeti

    जुन्या काळच्या स्त्री च्या भावना अचूक व्यक्त करणारी कविता.
    रसग्रहण सुंदर .

    1. Parvin Dani

      सुंदर रसग्रहण कवितेचे …माहेरची ओढ हि प्रत्येक स्रि च्या जीवनातील कधीहि न पुसली जाणारी सुखद आठवण आहे

  2. कवितेचे रसग्रहण छान आहे.

    भावकवी म्हणून ओळखले जाणारे कवी कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब यांनी लिहिलेली ‘घाल घाल पिंगा वाऱ्या ……’ ह्या कवितेला वेगवेगळ्या कालखंडात तीन वेगळ्या संगीतकारांनी तीन वेगळ्या गायिकांकडून गाऊन घेतले आहे.
    कालखंड वेगळा असल्याने तिन्ही गाण्याची चाल आणि गायकीतील फरक जाणवतो. आपल्यासाठी ही तिन्ही गाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. (इंटरनेटवर प्रथमच ही तिन्ही गाणी एकत्र ऐकावयास मिळत आहेत.
    ही गाणी मिळवून देण्याकरीता मला आपल्या सारख्या रसिक श्रोत्यांकडून खूप मदत झाली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद). गाण्याच्या प्रसिद्धीचे अचूक वर्ष माहीत नसल्याने गाण्यांचा काही विशिष्ट क्रम लावता आला नाहीय.

    पहिले गाणे आहे, बालभारतीने १९६५ मध्ये काढलेल्या ध्वनिमुद्रिकेवरील गाणे. गायिका आहेत फैयाज यानी मुले संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी. (इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध)
    दुसरे गाणे आहे, संगीतकार कमलाकर भागवत यांचे आणि मधुर आवाजात गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. हे गाणे जास्त प्रसिद्ध आहे.
    तिसरे गाणे आहे, जुन्या काळातील गायिका कालिंदी केसकर यांनी गायलेले आणि संगीत दिले आहे ए. पी. नारायणगावकर यांनी.

    आपला अभिप्राय नक्की कळवावा.
    चारुदत्त सावंत.
    तळेगाव दाभाडे – ८९९९७७५४३९

    https://charudattasawant.com/2021/09/12/balbharati-poem-songs-5/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!