भाग २४ हरवून गेल्या जाणिवा…
सौ.दर्शना भुरे…
आपल्या निरागस लेकीत झालेला बदल पाहून विमल तीळ तीळ तुटत होती.ती एक आई असूनही तिच्या साठी काही करू शकत नव्हती..
पुढे..
वैकुची परीस्थिती आईला पाहवत नव्हती.
तिच्या भविष्याची चिंता तिला खावू लागली होती.
तिला आपल्या नंतर कोण सांभाळील कोण आधार देईल याचा च तिने ध्यास धरला होता.
वैकुंठाच्या काळजीपोटी तिने खाणे पिणे जवळपास सोडले होते.
. बायकोच्या मनातील खंत मधुकरराव ओळखत होते.त्यांची अवस्था तिच्याहून वेगळी नव्हती. तरी ते बायकोची समजूत काढीत.
आपल्या वैकुसोबत आपण आहोत आपली वैकु एकटी नाही असे तिला सतत हिंमत देत ..
पण विमल एक वैकुंठाला सोडून कायमची दूर निघून गेली.आई वारली आता वैकुंठाला माया लावणाऱ्या
तिच्या आबा शिवाय या दुनियेत दुसरे कोणी उरलं नव्हते.
आबा दिवसेंदिवस थकत चालले होते .
हातातोंडाशी आलेला लेक असा अचानक आपल्याला सोडून जाईल असा विचार वसंतराव ने कधीच केला नाही. विनायकचा चेहरा त्यांच्या नजरेसमोरून जात नव्हता.
विनू मेला नाही तर संपत्तीच्या हव्यासापोटी त्याचा खून झाला होता . हा संशय वसंतराव ला आल्याने त्यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला होता पण सबळ पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटले.. तपास सुरू होण्याआधीच संपला होता. मुलगा गेला वसंतरावची जणू जगण्याची इच्छाच संपली..
वैकुची सासू तर आधीच तिला अपयशी दाड पायाची समजत होती.ती वैकुंठाला ठेवून घ्यायला तयार नव्हती.
वैकुंठाचे उर्वरित जीवन
आबांच्या सावलीत दिवस कटत होते.
भावांनी तर तिची साथ कधीच सोडली होती.
विनायक राव गेले यात वैकुंठाचा काय दोष होता पण व
सासू सर्व दोष वैकुलाच देत होती.त्यांचा पोटचा मुलगा गेल्याचे दुःख त्यांना झाले
मान्य आहे. पण माझ्या वैकुचे काय तिला खेळण्या बागडण्याच्या वयात वैधव्य आले.संसार काय असते लग्न काय असते हे समजण्याआधीच देवाने तिला एवढी मोठी शिक्षा का द्यावी..
एकंदर परिस्थिती पाहता मग आबाने वसंतराव शी बोलून तिला सासरी नेवून सोडण्याचे ठरवले. वसंतराव समजूतदार होते.
सासूने तर वैकुसोबतचे नाते केव्हाच तोडले होते.
विनायकराव च्या आईला एक ना एक दिवस वैकुची दया येईल आणि त्यांना आपली चूक समजेल अशी मधुकरराव मनाची समजूत काढीत होते.
आबा नंतर जानकी ही एकच व्यक्ती तिच्या आयुष्यात होती ती तिच्या वैकुंठाअक्काला माया लावित असे..
तिने एकट्या पडलेल्या वैकुंठाला आता अकोल्यात राहण्यासाठी बोलावून घेतले.
सासूच्या निधनानंतर
सासू सोबत राहत असलेला दोन खोल्यांचा वाडा आजीला मिळाला होता. तो विकून वैकुंठा जानकी च्या म्हणण्यानुसार अकोल्यात आली. मिळालेल्या पैशातून तिथेच तिने एक छोटीशी जागा घेतली.त्या जागेवर दोन खोल्या उभारल्या अंगणात सावलीला छान उंबराचे झाड लावले होते.
त्याखाली आजी दुपारी विश्रांती घेत असे. आजूबाजूची मुले खेळायला येत येत तेव्हा आजी त्यांना आपल्या हाताने उंबरे तोडून खायला देई.. त्यांना छान छान गोष्टी सांगी आजीने दिलेली गोड उंबरे मुले आवडीने खात..मुले तिला उंबराखालची आजी म्हणून ओळखत..
आजीच्या आयुष्यातील ते छान दिवस होते …
आधी नवरा मग त्यापाठोपाठ आई आबा सासू सासरे असे एक एक नातेवाईक काळाच्या पडद्याआड गेले.. वैकुंठा आयुष्यात हळूहळू एकटी पडत गेली ..
तेव्हा जानकीने त्यांच्या धाकट्या बहिणीने खूप त्यांना आधार दिला होता. पण जानकी ही एका छोट्या आजाराचे निमित्त होवून मरण पावली होती.तिच्या पासून दूरावली ती कधीही न परत येण्यासाठी तेव्हा आजी खूप रडली होती..
वैकुंठा आजीचे घर आमच्या घरापासून काही अंतरावरच होते.
वनिता अधूनमधून तिच्या मोठ्याआईसोबत आजीच्या घरी जात असे तेंव्हा आजीला घरकामात मदत करत असे.. ज्यावेळी वैकुंठाआजी वनिता पहिल्यांदाच भेटली होती.
वैकुंठा आजीचा गंभीर चेहरा पाहून वनिता ची घाबरगुंडी उडाली होती.
आपल्या कडून थोडीही चूक झाली तरी आजी आपल्यावर रागावतील या धाकाने ती आजी समोर तोंडातून शब्द ही काढत नसे..
पण आजीच्या सानिध्यात राहून वनिता ला
आजीचा प्रेमळ स्वभाव जाणवला. तिच्याविषयी मनात बाळगलेले सर्व गैरसमज हळूहळू दूर झाले..
काळ पुढे सरकला..
आजीने एव्हाना जवळपास वयाची ऐंशी वर्षे ओलांडली होती.आता वयोमानामुळे तिच्या कंबरेत बाक आला होता त्यामुळे चालण फिरणे अवघड जाऊ लागले होते. शेवटी शेवटी ती काठीचा आधार घेऊन चालू लागली होती.
वनिताला आठवते तसे तिने आजीला नेहमी आपल्याला घरकामात गुंतवून ठेवलेले पाहिले..ऊन, थंडी, पाऊस कुठल्याही ऋतूत आजी नेहमी सकाळीच उठून आंघोळ करून देवदर्शनाला जात असे.. नंतर घरातील कामे उरकत असे..
एक दिवस देवदर्शनाला जात असताना चक्कर येवून पडण्याचं निमित्त झाले आणि आयुष्यभर काटकतेने जगणाऱ्या आजीने अंथरुण धरले.. आजीला सासरचे,माहेरचे असे कोणी उरले नव्हते..सुधाचे म्हणजे च जानकीच्या सुनेचे वैकुंठा आजी सोबत दोन्ही कडचे नाते लागत होते.. वैकुंठाआजी नात्याने सुधाच्या आईची काकू होती. त्यामुळे ती वैकुंठाआजींची दुखण्यात देखभाल करू लागली .
त्यांना घरी जाऊन वेळच्या वेळी खाणे, औषध देवू लागली..
तेव्हा आजी तिला म्हणायच्या सु़धा अग मला मेलीला देव एकदाचा का उचलत नाही किती दिवस मी आता दुसऱ्या वर भार बनून पडून राहीन खोलीतच ..! “
तेव्हा सुधा तिला हिंमत द्यायची.
तसे आजी म्हणायची
अगं चालणं होत नाहीये, अंग ठणकतेय , आता सहन होत नाही.
आजी तर शेवटी शेवटी औषध,जेवण टाळू लागली होती.तरीही सुधा तिला बळेबळे च खाऊ घातले.
एक दिवस सुधा ला कसल्यातरी कामाला परगावी जायचे होते म्हणून तिने वनिताच्या हाती आजीसाठी उप्पीट आणि हळद घालून दूध पाठवले.. आजी ते सर्व खुणेनेच वनिताला ठेवून द्यायला सांगितले.वनिताने आजीने सांगितल्याप्रमाणे ठेवून घराकडे धूम ठोकली.. संध्याकाळी सुधा नेहमी प्रमाणे परत आजीकडे चहा घेऊन आली असता आजी सकाळपासून ऊठल्याच नाहीयेत असे तिच्या लक्षात आले सकाळचे दुध, उप्पीट तसेच पडून होते.
त्याला आजीने स्पर्श ही केलेला दिसत नव्हता.. आजी झोपतेच कन्हारत होत्या..
पुढील भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/भाग-२५-हरवून-गेल्या-
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.





वैकुंठा आजीचा खडतर प्रवास.
छान हृदयस्पर्शी कथा