८-उलटे पडले फासे
८-उलटे पडले फासे

८-उलटे पडले फासे

उलटे पडले फासे – ८
राहूल आणि  मनिष या दोन्ही मित्रांना योग्य मार्गावर आणण्याचे विनयचे प्रयत्न यशस्वी होतात कि तोच कुठल्या अडचणीत सापडतो…..वाचा पुढील भागात
दिनांक
आज पुन्हा राहूलने चोरी केली. शाळेत  नवीन प्रवेश घेतलेल्या मुलाची वही चोरली.मला दिसला चोरतांना पण मनिषने मला चूप बसवले.
हे दोघे परत आधीसारखेच बनले. आता अजून निर्ढावले पण मी काहीही करु शकत नाही.आता यापुढे मी माझ्या अभ्यासावरच अधिक लक्ष केंद्रित करणार.
शाळेत आज सगळे पिरेडस् झाले.
गृहपाठ पण भरपूर दिला. मी संपवला आताच.
दिनांक
राहूल,मनिषचे चोरी करण्याचे प्रमाण वाढतच आहे.
दोघांनाही चोरी करण्याची गरज नाही. मग हे का चोरी करतात?
बाबांनी तर आधीपासून मला हेच शिकवले कि कितीही गरज असली तरी चोरी करु नये.
दिनांक
आज मी दोघांनाही विचारले चोरी का करता तर दोघेही हसायला लागले आणि  आम्हाला मजा येते असे सांगितले.
तुमच्या घरी माहीत झाले तर?
कोण सांगेल मनिषने विचारले.
दिनांक
आज राहूलसोबत मी त्यांच्या वर्गात गेलो होतो. त्याला अर्पिताला भेटायचे होते. अर्पितासमोर किती चांगला वागत होता तो. आणि मनिष कविताच्या पुढे पुढे करत होता,
त्याला बहूतेक कविता आवडायला लागली.
(मनिष-अरे लेका तुझ्या लक्षात आले होते का? जाम आवडायची ती मला.तिलाही मी आवडलो असतो तर….)
दिनांक
माझे दोन्ही मित्र मोठे झाल्यावर चोर बनणार असेच मला वाटत आहे. सहजपणे चोरी करतात.
(मनिष- विनय, नाही बनलो आम्ही चोर)
दिनांक
आठ दिवस झाले त्या गोष्टीला.आताही आठवून घाम फुटतो मला. पाय लटपटायला लागतात. नको नको वाटतं ते आठवायला.
पण ते आता नेहमीच आठवत राहणार.मी विसरलो तरी बाकीचे विसरु नाही देणार.
त्यादिवशी राहूलने संतोषच्या दफ्तरातले कॕलक्युलेटर चोरले. संतोषच्या परदेशात राहणाऱ्या काकांनी ते आणले होते. त्याने मित्रांना दाखवायला आणले होते.
राहूलने ते चोरुन माझे दफ्तर तपासल्या जाणार नाही या उद्देशाने माझ्या दफ्तरात लपवले.  मला हे माहित नव्हते.
संतोषच्या लक्षात आले कॕलक्यूलेटर चोरी गेल्याचे.त्याने बाईंकडे तक्रार केली. बाईंना राहूल आणि  मनिषच्या आधीच्या छोट्या चोऱ्या माहीत होत्याच.म्हणून त्यांनी आधी त्या दोघांचे दफ्तर तपासले. त्यात काहीही मिळाले नाही.
शेवटी बाई सगळ्यांचे दफ्तर तपासायला लागल्या.तपासता तपासता माझ्या पर्यंत पोहचल्या. बाईंनी माझे दफ्तर तपासायला घेतले आणि त्यातून कॕलक्यूलेटर बाहेर काढला.
बाईंसाठी,माझ्यासाठी आणि पूर्ण वर्गासाठीच हा मोठा धक्का  होता.
बाई खूप रागवल्या मला.म्हणाल्या
मला तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती विनय. राहूल आणि मनिषची संगत सोड.त्यांच्यामुळे तुझे नुकसान होईल. तुझी ही पहिली चोरी म्हणून माफ करते.यानंतर असे काही केले तर तुझ्या वडिलांना बोलवावे लागेल.
मला चोर माहित होते पण त्यांचे नाव पुढे आले असते तर त्यांचे नाव शाळेतून काढले असते.कारण त्यांच्या तक्रारी होत्याच. त्यांचे खूप नुकसान झाले असते म्हणून मी चूप होतो.पण मनातून खूप दुखावलो.परवा  दोघेही माझ्याजवळ येऊन माफी मागत होते. मी त्यांच्याशी न बोलणे त्यांना बोचत होते. पण त्यांना हीच शिक्षा योग्य आहे.
राहूलने आठ दिवसात चोरी केली नाही.
वर्गात मी गेलो कि मुले मला चोर आला म्हणतात.खूप वेदना होतात मला. राहूल,मनिषला राग येतो .त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो राग.
(मनिष- विनय खूप मोठी चूक केली होती आम्ही. गमतीगमतीत चोरी करता करता असे काही होईल असे वाटले नव्हते.
आम्हाला क्षमा कर यार)
मनिषचे डायरीत वरचे वाक्य लिहिता लिहिता  वाचता डोळे लागले.
अहो डायरी वाचता वाचताच झोपले कि काय?
असे म्हणत शिल्पाने डायरी उचलून बंद केली. आणि कपाटात व्यवस्थित ठेवली.या डायरीबाबातीत मनिषचा हळवेपणा तिला माहीत होता.
 लग्नानंतर  मनिषने शिल्पाला डायरी दाखवत
 आज जो मी आहो तो ह्या डायरीमुळेच हे सांगितले होते.
 विनयला तिने कधीही बघितले नव्हते.तरीही ती या डायरीमुळे त्याला ओळखत होती.
राहूल मनिषला भेटून घरी आला.अर्पिता आणि त्याची लेक रुही जेवायसाठी त्याची वाट बघत होत्या.पण तो मला भूक नाही.तुम्ही जेवून घ्या असे सांगत बेडरुममध्ये गेला.
आजच्या विनयच्या बातमीने हादरला होता तो.
विनय अतिशय हूशार,प्रामाणिक ,संस्कारी प्रेमळ आईवडील असलेला मुलगा.हे कसे झाले असेल त्याच्यासोबत.
त्याला सगळे ठळक आठवत होते.
विनयला त्यादिवशी होस्टेलमध्ये अर्जंट घरुन फोन आला.
त्याला लगेच निघून जावे लागले.
काही मोजकेच सामान तो घेऊन गेला.दहावीचे वर्ष होते .लगेच वापस येणार असे त्याने बाईंना सांगितले.
कॕलक्युलेटरच्या चोरीपासून तो आमच्याशी जास्त बोलत नव्हता. मुले त्याला चोर म्हणायची तेव्हा खूप वाईट वाटायचे. कधी कधी वाटायचे सगळ्यांना सांगून टाकावे चोरी आम्हीच केली म्हणून. पण आम्हाला शाळेतून काढून टाकतील म्हणून काही बोलू शकत नव्हतो.
विनय गेला.आठ दिवस, पंधरा दिवस,महिना संपला पण विनय परतला नाही.
ना काही शाळेत त्याचा निरोप आला. आता मात्र आम्हाला काळजी वाटायला लागली.
दहावीचे वर्ष आहे.शाळेत पहिला येऊ शकणारा विनयसारखा जबाबदार मुलगा तसेच काहीतरी  कारण असल्याशिवाय असे वागू शकणार नव्हता.
मी आणि मनिषने त्याला पत्रे पाठवली पण त्याचेही काहीच उत्तर येत नव्हते.काय झाले असेल हे समजण्याचा काहीही मार्ग नव्हता.विनयच्या अशा वागण्याने आमचे अभ्यासातही लक्ष लागत नव्हते.

क्रमशः

९-उलटे पडले फासे

प्रिय वाचक,हा कथामालिकेचा पहिला भाग.
तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा.तुमचा प्रतिसाद,तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाची आहे.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

 

आभास हा छळतो मला….कथामालिका  लिंक

https://marathi.shabdaparna.in/१

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!