बापू आणि मंजुळा यांना सहा अपत्ये. ते दोघे मुंबईत राहायचे. काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातलीच एक ‘लक्ष्मी’ .
तिला घरात सर्वजण बचाबाई म्हणायचे. गावाकडे असतानाच म्हणजे बचा चौथीला असतानाच आई-बाबांनी तिचं लग्न लावून दिलं. त्या बालवयात लग्न म्हणजे काय हे सुद्धा त्या खेळकर, अल्लड, निरागस आणि निर्व्याज्य मुलीला कळत नव्हते.खेळण्याच्या भातुकली…. यापलीकडे विश्व नाही
त्या काळात म्हणजे १९५० ते ५५ च्या काळातील जागर हाटी प्रमाणे मुलींचे सर्रास बालविवाह होत असत. त्याच नियमाने लक्ष्मीचे लग्न झाले. चौथीच्या वर्गात बसलेली असताना तिची आई एक दिवस शाळेत आली व लक्ष्मीला म्हणाली,
“लक्ष्मी घरी चल तुला बघायला पाहुणे आले आहेत….”
लक्ष्मीन आपल् पाटी-पुस्तक घेतलं आणि आईच्या हाताला धरून चालू लागली. रस्त्याने चालताना ती आईला म्हणाली,
“आई पाहून बघायला आलेत म्हणजे काय ग…?”
त्यावर आई म्हणाली,
“अग आता तुझं लग्न होणार….”
तिचा पुन्हा बाल प्रश्न,
“आई लग्न म्हणजे काय….? सांग ना…..”
त्यावर आई तिला म्हणाली,
“अगं काही नाही…..तू चल भराभरा पाहून पोहोचले असतील…..”
लक्ष्मीला घेऊन आई घरी आली. पाहुणे येऊन बसले होते. लग्नाची बोलणी झाली. नवरदेवा कडील मंडळींनी आणलेली साडी तिला नेसवण्यात आली.
“आई हे सगळं का करतेय….?”
तिने आईला विचारलं आईचा कंठ दाटून आलेला. आई निरुत्तर……
साखरपुडा झाला, ठरल्याप्रमाणे लग्नही उरकले. लक्ष्मीची सासू तिच्या आई-वडिलांना म्हणाली,
“अजून अज्ञान आहे….काही वर्ष तुमच्याकडेच राहील…. पुढच्या पुढे बघू….”
एवढे बोलून ती मंडळी आपापल्या गावी गेली.
इकडे दिवस, महिने, वर्ष सरत गेली. लक्ष्मी मोठी झाली. आईला खूप आनंद झाला. तिच्या सासूला कळविण्यात आले. ती येऊन लक्ष्मीला सासरी घेऊन गेली. एका मोठ्या एकत्र कुटुंबात तिचं आगमन झालं. घरात दिवसभर काम काम आणि काम च….. लहानगी लक्ष्मी दिवसभर कामात गढून जायची. तिच्या जावा आपापली कामं वाटून घ्यायच्या, तसे त्यांना करावे लागे. कारण त्या काळात आताच्या सारख्या सुविधा नसत. सर्व कामे हातानेच करावी लागत असत. विहिरीतून पाणी शेंदण्यापासुन तर जात्यावर दळण दळून, स्वयंपाक करण्यापर्यंत लक्ष्मीला त्या घरात कष्टाची सवय झाली.
त्याकाळात गावोगावी पोलीस भरतीसाठी गाडी घ्यायची. ज्या कुणाला पोलीस व्हायचे असेल त्याला नोकरीसाठी घेऊन जायची. अशीच एकदा गाडी आली गावातील मुले गोळा झाली. लक्ष्मीच्या नवऱ्याला पोलिसाने विचारले,
“शाळा किती झाली…?”
त्यावर तो म्हणाला,
“चौथी पास आहे…”
ते म्हणाले,
“जा तुझ्या आई वडिलांना बोलावून आण….”
तो त्याच्या आईला घेऊन आला पोलीस म्हणाले,
“तुमचा मुलगा उंचपुरा आहे…. शिवाय चौथी पास आहे….पोलीस भरती करणार का…..?“त्यावर त्या ची आई म्हणाली
“माझा नवरा देवाघरी गेला आहे…. माझी मुलं माझ्या जगण्याचा आधार आहे…. एक भाकरी वाटून खाऊ पण मी पाठवणार नाही…..”
त्या काळात मुले ही आईच्या पुढे काही बोलत नव्हती. लहान लक्ष्मी आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. तिच्या रात्रंदिवस कष्टाला काही तुटवडा नव्हता. विहिरीतून पाणी, शेंदण्यापासून, पिढीजात व्यवसायात मदत करणे, जात्यावर दळण दळणे इत्यादी, कामं करावी लागत.
लक्ष्मी वाघिणीसारखी काम करायची. लक्ष्मीला चार मुलीआणि तीन मुलं झाली. लक्ष्मीला सात लेकर झाली. प्रत्येक वेळी बाळांतपण घरातच व्हायचं. तिचा संसाराचा व्याप वाढला होता. नवरा-बायको आणि सात मुले असे तिचे कुटुंब जगत होते. मुले थोडी मोठी झाली होती. एका वर्षी प्रचंड दुष्काळ पडला. शेती पिकली नाहीत. सगळीकडे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. जो तो जगण्याचा संघर्ष करू लागला. लक्ष्मीच्या आणि तिच्या नवऱ्याला सात मुलांना कसे जगवायचे हाच प्रश्न सतवायचा. त्या दोघांनी मुलांना फक्त शाळेचाच रस्ता दाखवला होता. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते आपल्या मुलांना मिळालेच पाहिजे…. असे त्यांना वाटायचे.
दुष्काळामुळे खाण्याचे सर्वांचेच हाल होत होते. मुलांना जगण्यासाठी तिची धडपड सुरू असायची. कुठल्याही लेकराला उपाशी ठेवत नसे. काही वेळा अगदीच काही नसेल तर ज्वारीच्यामूठ मूठ लाह्या भाजून दे. भाजीचे गोळे परतून दे, असेही कधी-कधी मुलांसाठी ती करत असे. गावातील इतर बायका प्रमाणे लक्ष्मी ही बराशीखांदायल जायची. सरकार माळरानावर पाणी जमिनीत मुरण्यासाठी किंवा मोठे मोठे खड्डे खणून घ्यायची आणि मोबदला तुटपुंजा द्यायची. अक्षरशः ते एक प्रकारचे ढोर कष्ट असायचे. लक्ष्मी वाघिन च होती दुष्काळाला धैर्याने तोंड देत होती. स्वतःहा दुष्काळाच्या झळा सोसुन मुलांवर मायेचा हात फिरवत होती.
तिचा मुलगा मोठा झाला दहावी पास झाला. बाहेरगावी शिकायला गेला त्याचे शिक्षण झाले. त्याला शहरात नोकरी लागली. मोठा मुलगा आईला आणि लहान भावंडांना घेऊन शहरात आला. एव्हाना सर्वांची उच्च शिक्षण झाले, लग्न झाली, मोठ्या मुलाने लक्ष्मीचे कुटुंब सावरलं. प्रत्येकजण आपापल्या संसारात रममाण झाले. चार मुलींची आणि दोन मुलांची प्रत्येकी दोन-दोन बाळंतपण लक्ष्मीनेच केली. ती मोठ्या मुलाकडे राहू लागली. मोठ्या मुलांना तिला सुख समाधान आणि एक समृद्ध आयुष्य दिलं. अचानक तिला त्रास होऊ लागला डॉक्टरने सांगितले हृदयाचे ऑपरेशन करावे लागेल दोन्ही मुलांनी खूप पैसा खर्च केला आणि आईला बरे केले. पण ऑपरेशन नंतरही तिला खूप त्रास व्हायचा ती जोरजोरात ओरडायची, गडा गडा लोळायची, घरातील लोक घाबरून जायचे. आता तिला कोणी संभाळायचे असा प्रश्न होता. जो तो आपली अडचण सांगू लागला. शेवटी तिला गावाकडे एक खोली बांधून दिली. ज्या जागेत लक्ष्मीने सानपावलांनी गृहप्रवेश केला होता.
तिथे आता कोणीही राहत नव्हते. सगळीकडे पडझड झालेली. तिथेच तिला खोली बांधून दिली. लक्ष्मी तिथे राहू लागली, उभी हयात मुलाबाळांसाठी झिजलेली लक्ष्मी शेवटचा फक्त काही काळ एकटी राहू लागली. दिवाळीचा सण जवळ आला होता. ती शेजारणीला म्हणाली,
“कस्तुरा बघ ऐक तरी लेकरू येऊन मला चार दिवस सणासाठी घेऊन जाईल असे वाटत होते…. पण तसे काही झाले नाही मी एवढ्या लेकरा बाळांची आई आहे…मी सणाला कसा नाट लावू..”
तो दिवाळीचा पहिला दिवस होता. तिने करंज्या करण्याचा घाट घातला.
त्यावर कस्तुरा म्हणाली,
“तुम्हाला गोड खायच नाही तर कशाला करत बसताय…?”
“अगं….मुलाबाळांची आई आहे…. सणाला घरात गोडधोड असावं…”
त्यानंतर कस्तुरा तिच्या घरी गेली. लक्ष्मीने करंज्या करायची तयारी केली.अचानक तिच्या छातीत दुखायला लागले, अटॅक आला, रात्रीची वेळ कोणाला कसलाही पत्ता नाही. घरात लक्ष्मी एकटीच मृत्यूशी झुंज देत आहे….. ती त्याच्याशी निकराने लढलीच असणार कारण ती एक झुंजार ….आणि धाडसी …..स्त्री होती. पण शेवटी तिने त्याला मुक समर्पण केले.
ज्या लक्ष्मी ने उभी हयात मुलाबाळांसाठी घालवली ती शेवटच्या क्षणी एकटीच होती. प्रेम,त्याग, कर्तव्य या सर्वांच्या पलिकडची असलेली भावना म्हणजे समर्पण लक्ष्मीने तपस्या, साधना म्हणून स्वीकारले. अतिशय समर्थनीय आणि मनाच्या गाभार्या पासून वंदन करावे. इतकी पवित्र भावना ती लक्ष्मीसाठी एक स्वइच्छेने स्वीकारलेली साधनाहोती. तिच समर्पण सार्थ …की व्यर्थ …..याला काय म्हणावे शेवटच्या क्षणी मुलांची आई प्रति कृत ……कि कि तिच नियतीला मूक समर्पण……..









सुंदर लिखाण
छान कथा
सुंदर … लिहिले
सुंदर लेख
सुंदर लेखन
Chan 🌹🌹🌹
Chan