भाग-१८
उलटे पडले फासे
पोलिसस्टेशन
मानकरसर पोलीसस्टेशनला आले.साळूंकेला विनयची फाईल मागवली. आणि मयंकच्या घरी निघाले.
शिखा घरी एकटीच होती.
मानकरसरांना पुन्हा बघून खुनी सापडला कि काय असे तिच्या मनात आले.
या सर,बसा.
सापडला का खुनी सर?
नाही.त्याच संदर्भात आलो मी.
एकदा थोडी विचारपूस करायची होती.
विचारा ना काय विचारायचे ते.
तसे त्यादिवशी मी तुम्हाला सगळे सांगितलेच आहे.
पण मयंकचा खुनी शोधायला मदत होत असेल तर माझी काही हरकत नाही.
शिखामॕडम मला सगळे आठवून सांगा.
नेमके काय झाले त्या रात्री?
मी नेमकी माहेरी गेली होती त्या रात्री.
आठवड्यातून एकदा आईबाबांना भेटायला जातेच मी.
त्या रात्री उशिरा गेली.म्हणून मग रात्रभर तिथेच थांबली.
सकाळी चौकीदाराचा फोन आला तेव्हा आम्ही सगळे झोपूनच होतो.
फोन आल्याबरोबर लगेच निघालो.
हे तर त्यादिवशी पण सांगितले होते.
अजून अजून काही आठवते का?
नाही साहेब जे झाले ते मी सांगितले.
त्यांचे कुणासोबत शत्रुत्व?
नाही.मयंकचा स्वभाव आपले काम आणि आपले घर असा असल्यामुळे त्याचे कुणाशी भांडण झाल्याचे कधी ऐकले नाही मी.
फोन आल्यावर कोणकोण आले इथे?
मी,आई-बाबा.
तुमचा भाऊही राहतो नं आईबाबासोबत.
हो.शेखर नाव आहे त्याचे.
पण तो आम्ही आल्यानंतर थोड्यावेळाने आला.
फोन आल्यानंतर मी खूप घाबरली होती.त्याला आवाज दिला कि नाही हेही मला आठवत नाही.
मी,आईबाबा आम्ही तिघेच गाडीने आलो हे नक्की.
काहीवेळाने मला तो दिसला.
त्याला आवाज जरी नाही दिला तरी घरी चाललेल्या गडबडीने तो उठू शकला असता.
मानकरसरांच्या डोक्यात आले.
तुम्ही झोपले तेव्हा शेखर घरीच होता का?
हो.आम्ही सोबतच जेवलो.जरावेळ गप्पाही केल्या.
त्याला मी एकदोन बिझनेसच्या आयडियाज् ही दिल्या.
तो रिकामाच आहे का सध्या?
हो.मध्ये त्याने बांधकाम व्यवसाय सुरु केला होता.पण नंतर मंदी आली आणि त्याचा धंदा बसला.
मग आता सध्या काय करतो तो?
काही नाही.
नवीन काहीतरी सुरु करायचे आहे त्याला.
तुमचे वडील काय करायचे मॕडम?
बाबा सरकारी अधिकारी होते.सेवानिवृत्त झाले पाच वर्षापूर्वी. बाबांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात झाले. घरची परिस्थिती गरीब पण जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले.अर्थात आईची मोलाची साथ त्यांना मिळाली.
मी आणि शेखरने त्यांच्यासारखेच सरकारी अधिकारी बनावे अशी त्यांची इच्छा होती.महत्वाकांक्षाच होती म्हणा.
पण मी काॕलेजच्या फायनल इयरला असतांनाच माझे मयंकशी लग्न झाले.आणि मी त्याला बिझनेसमध्ये मदत करु लागले.
शेखरला आधीपासूनच शिक्षणात कमी रस होता. बाबांनी डोनेशन भरुन त्याला खाजगी अभियांत्रिकी काॕलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला.पण अभ्यास जास्त आहे असे कारण सांगून त्याने शिक्षण अर्धवट सोडले.
बाबा सतत आॕफिसच्या कामानिमित्त बाहेर राहायचे. घरी आम्ही तिघेच.शेखर लहान असल्यामुळे खूप लाडात वाढला. माझ्यात आणि त्याच्यात
सहा वर्षाचे अंतर त्यामुळे माझाही तो लहानपणापासून लाडका आहे.
त्याला पैशांची चणचण राहत असेल.
हो.असते ना.मला मागतो कधी कधी.
मयंक करायचा का कधी मदत त्याला?
हो.बांधकाम व्यवसायासाठी त्याने आणि बाबांनीच मयंकला पैसे दिले होते.
आता पुन्हा त्याला हवे होते नवीन व्यवसायासाठी पण यावेळी मयंकने नकार दिला.
हे ऐकून मानकर सर चमकले.
मयंक त्याला कंपनीत नौकरीसाठी बोलवत होता पण त्याला ते काम आवडले नाही.
कुठे राहतात तुमचे आईबाबा?
इथून पाच किलोमीटर वैशाली नगरमध्ये.
ठीक आहे शिखामॕडम.येतो मी.
हो साहेब.
काही समजले तर कळवा मला.
हो.
असे म्हणत मानकर सर काहीतरी विचार करत तिथून निघाले.आणि सरळ शिखाच्या माहेरी पोहचले.
शिखाच्या आईबाबांना भेटले. त्यांची चौकशी केली.
दोघेही सज्जन वाटत होते.
तुमचा मुलगा शेखर नाही का घरात?
नाही.तो मित्रांसोबत महाबळेश्वरला गेला दोन दिवसांसाठी.
चला येतो मी.
असे म्हणत मानकर सर उठले.आणि पोलिसस्टेशनला गेले.पण त्यांच्या डोक्यात आता विचारांचे नवीन चक्र सुरु झाले होते. शेखरचे वागणे त्यांच्या मनात संशय निर्माण करत होते.
शेखर मयंकच्या घरी उशिरा का पोहचला असेल हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. त्याला असलेल्या पैशांच्या गरजेमुळे संशय बळावत होता.
पुढील आठवड्यात मयंकच्या खुनाची केस कोर्टात जाणार होती.त्याआधी हाती धागेदोरे येणे आवश्यक होते.
दोन दिवसांनी तो परत शेखरची चौकशी करायला त्याच्या घरी गेला.शेखर नुकताच परतला होता.
मानकरसरांना बघून तो चपापला.
साहेब तुम्ही?
हो.जरा चौकशी करायची होती.
आईबाबा दिसत नाही आहेत?
आहेत आत. बोलवू का त्यांना?
नको.आज तुझ्याशीच काम आहे.
शेखरचे घाबरलेपण मानकरसरांच्या लक्षात आल्याशिवाय राहले नाही. थंडीतही त्याला घाम आला होता.
अरे शेखर,किती घाबरलास? मी तर अजून चौकशीही सुरु केली नाही.
साहेब माझी चौकशी? कशाला? आणि मी कशाला घाबरु?
तू प्रश्न विचारु नकोस.मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे.
मानकरसरांच्या आवाजात जरब होती.
विचारा साहेब.शेखर चाचरत बोलला.
मयंकचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास?
घरीच होतो साहेब.
मग शिखा खून झाल्यावर तिथे गेली तेव्हा तू सोबत नव्हता.
साहेब, मी झोपून होतो. झोपायला उशीर झाला .
आईबाबा,शिखाताई गेले होते तेव्हा मी गाढ झोपून होतो.मला कोणी आवाजही दिला नाही.
शेखर आता आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देत होता.
मग दहा पंधरा मिनिटांत तू गाढ झोपेतून कसा जागा झाला? आणि लगेच मयंकच्या घरी पोहचलास?
शेखर थोडा विचारात पडल्यासारखा वाटला.पण लगेच बोलला,
साहेब बहूतेक मी गाडीच्या आवाजाने उठलो.
शिखाताईने गाडी काढली.बंगल्याच्या चौकिदाराला उठवायला गाडीचा हाॕर्न वाजवला असणार.
अच्छा हाॕर्नच्या आवाजाने तू उठला आणि लगेच मयंकच्या घरी पोहचला.
तुला कसे समजले ते मयंकच्या घरी गेल्याचे?
मी हाॕर्नच्या आवाजाने उठलो आणि गाडी कोणी नेली ते बघायला बाहेर आलो.कोणी दिसले नाही म्हणून शिखाताईला फोन केला.आणि मग तिच्या घरी गेलो.
शेखर सफाईने उत्तरं देत होता. पण त्याने तिला फोन केला हे शिखाने सांगितले नव्हते.
शेखर खोटा बोलत आहे हे मानकरसरांनी ताडले.
क्रमशः
…..प्रिती….
Next Part
Previous Link
विनयवर खुनाचा आळ आहे तो खून शेखरने केला असेल का……
वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे….आवर्जून सांगा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




छान कथा