३-उलटे पडले फासे
मनिष,राहूल आणि त्यांचा आदर्श असलेला ,त्यांच्या आयुष्याला वळण लावणारा त्यांचा मित्र विनय यांची ही कथामालिका. सरळ एका रेषेत स्वप्नपूर्तीच्या वाटेवर चालणारे आयुष्य एखाद्या प्रसंगाने उध्वस्त होऊन जाते.
आयुष्यात एकदा उलटे फासे पडले कि…..
भाग-३
दिनांक
गेले आठ दिवसात डायरी लिहायला नाही मिळाली.
वेळ होता पण इच्छाच नाही झाली.मी इथे येतांना बाबांनी आवडीने मला ही डायरी दिली आणि रोज लिहीत जा असेही सांगितले.
आज बाबांचे पत्र आले.त्यातही डायरी लिहीतोस का असे विचारले.बाकी सर्व ठीक आहे.तब्येतीची काळजी घे.अभ्यास कर.तिथे राहायची हळूहळू सवय होईल ….वगैरे.
नाही हो बाबा हे एवढे सोपे. कठीण जातयं सगळं.
(मनिष- आम्हालाही कठीण जात होते विनय पण व्यक्त होता येत नव्हते. तुझ्यासारखी शब्दसंपदा नव्हती आमच्याजवळ)
दिनांक
आता पंधरा दिवस झाले येऊन.आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे खरेच हळूहळू रुळतोय मी.नवीन मित्र मिळाले. राहूल आणि मनिषशी पण छान गट्टी झाली. ते कधीही माझ्यासारखी घरच्यांची आठवण काढत नाहीत.नेहमी मजेत दिसतात. घरी कधी पत्र लिहितांनाही दिसत नाहीत.अभ्यास पण करत नाहीत.
(मनिष-मला यायचे नव्हते होस्टेलवर. गावी मी उनाड मित्रांच्या संगतीत वाया जाईल या भीतीने आईने मला होस्टेलवर ठेवले. आई घरी एकटीच होती.तिची काळजी वाटायची.मी आईला पत्र नाही पाठवले तर आई मला घरी घेऊन जाईल अशी आशा वाटायची.पण तसे काही झाले नाही.)
दिनांक
दोन दिवसांनी राखी आहे.दोन दिवस सूट्ट्या दिल्या.
उद्या बाबा येत आहेत घ्यायला. मी घरी जाणार या कल्पनेनेच छान वाटत आहे.
आई,आजी दिसणार.
विणा राखी बांधणार मला.
काय द्यावे तिला ओवाळणीत?
तिला गोष्टींचे पुस्तक वाचायला आवडते.तेच नेतो.
(मनिषः राखीला मला माझी बहीण मधुरा खूप आठवते रे.लहान होती माझ्यापेक्षा.दादा,दादा करत सतत मागे असायची.बाबा,मधुरा गेले आणि घराचे घरपण संपले.)
दिनांक
आलो आज वापस. दोन दिवस पटकन संपले.किती बरे वाटले सगळ्यांना भेटून. मी दिसल्याबरोबर राघू विन्या विन्या ओरडायला लागला.
राघूला आमच्या घराची खूप सवय झालेली.त्याला पिंजऱ्यातून बाहेर नाही काढले तरी तो उडून जात नाही.
राहूलही वापस आला आज. राहूलला दोन बहिणी आहेत. तारा आणि मीरा.
मनिष गेलाच नाही.त्याला बहिण नाही. त्याची बहिण आणि वडील एका अपघातात गेले.घरी आता फक्त आईच आहे. आई शिक्षिका आहे. आईवर मनिषचे प्रेम नसेल का?
(मनिष—खूप प्रेम होते लेका.म्हणून तर आईचा दुःखी चेहरा बघू नव्हतो शकत.आई बाबा,मधुरा नसण्याचे दुःख क्षणभरही विसरणे शक्य नव्हते.आईशिवाय दुसरे कोणी नव्हते मला.तरीही आईने मला होस्टेलमध्ये ठेवावे याचे दुःख वाटायचे))
दिनांक
सहामाही परिक्षा जवळ येत आहे. अभ्यास वाढवायला पाहिजे.
आईबाबा प्रत्येक पत्रात हेच सांगतात,चांगला शिक.मोठा हो. मलाही सरकारी अधिकारी बनायचे आहे. त्यासाठी आतापासून मेहनत करावी लागेल.
राहूल,मनिष ला पण मी अभ्यास करायला सांगतो. पण ते ऐकत नाहीत.
(मनिषः आम्हाला कंटाळा यायचा यार अभ्यास करायचा. शिवाय तुझ्या सारखा आत्मविश्वासही नव्हता.हुशार मुलांमध्ये आपला निभाव लागणार नाही असेच गृहीत धरुन चाललो होतो मी आणि राहूल. तू आमच्या आयुष्यात आला नसता तर आम्ही तसेच समजत राहलो असतो.तू आला आणि आयुष्यात बदलले.)
दिनांक
सहामाही परिक्षा संपली कि पंधरा दिवसाच्या सुट्ट्या आहेत.म्हणजे पुन्हा घरी जायला मिळणार. घर ते घर.
होस्टेलला घराची सर नाही येणार.
माझे मित्र पण दिवाळीसाठी माझी वाट बघतील.
सगळे मिळून आम्ही किल्ला बांधू.
फटाके,दिवाळीचा फराळ मज्जाच मजा.दिवाळी आली कि सगळीकडे उत्साहाला उधाण येते.
विणा अंगणात रांगोळी काढेल.मी पण तिला रांगोळीत रंग भरायला मदत करत असतो.
किती सफाईने रांगोळी काढते ती. रंगसंगतीची उत्तम जाण आहे तिला. चित्रेही हूबेहूब रंगवते.
मागे रांगोळी स्पर्धेत पहिला नंबर आला होता तिचा.
( मधुराला पण रांगोळी काढायची किती आवड होती.बाबा तिला बाजारातून रांगोळीची वेगवेगळे रंग आणून द्यायचे.तिच्या आयुष्यात रंग भरायच्या आधीच ती निघून गेली—मनिष)
विनयचे इतके सुंदर आयुष्य असेच राहते कि परिस्थितीच्या एका फटकाऱ्यात बदलते…वाचत रहा उलटे पडले फासे
Previous part
पुढील भागाची लिंक






छान लिहिले
सुंदर कथानक