स्वयंसिद्धा-भाग-५
गर्भाशयातले पाणी कमी झाल्याने सुप्रियाला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनीळा बाची शाश्वती दिली नाही.
बिंबातून प्रतिबिंब जन्मले
डॉक्टर रोज वेगवेगळी परिस्थिती सांगत होते की जीवाचा
थरकाप उडत होता. माधवला तातडीने बोलावून घेतलं.
सुप्रियाचा हात हातात घेऊन धीर तर देत होता पण त्याच्या चेहऱ्यावर भीती काळजी स्पष्ट दिसत होती.
‘ त्रास करून घेऊ नकोस, नशिबात लिहिलं असेल तेच होईल’.
त्याला कसं सांगायचं ? कसं दाखवायचं ? आईचं काळीज.
नऊ महिने काळजीने जगवलेला जीव आता वेळेला नाहीसा होणार, कल्पनाही अशक्य .
काळजीने दिवस रात्र एक झाली होती. डोळ्याला अखंड धारा होत्या.
घरी गौरी गणपतीचे आगमन झाले होते. कसाबसा तो सण पार पडला . दुसऱ्या दिवशी सिझर करावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं.
एका जिवातून दुसरा जीव सही सलामत बाहेर काढणं डॉक्टरांसाठीही एक परीक्षाच होती.
माधव आणि सुप्रिया नुसतं एकमेकांकडे बघत होते.
तसं जमिनीच्या पोटातून नांगर फिरावा तसं फा काळीज टराटरा फाटल्यासारखं वाटलं सुप्रियाला.
तिची एका फॉर्मवर सही घेतली. डॉक्टरांनी माधवच्या हाती भली मोठी औषधांची यादी दिली . आई बाबांकडे एकदा डोळे भरून पाहिलं , काय माहित त्यांची ही शेवटची भेट असेल किंवा नसेल आणि देवाचं नाव घेऊन ऑपरेशन थेटर मध्ये ती शिरली.
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी कानात जीव गोळा झाला होता . थोड्याच वेळात रडणारा गोड आवाज त्या खोलीच्या कानाकोपऱ्यातून घुमला . किलकिल्या डोळ्यांनी सुप्रियानी ‘ति’ च्याकडे पाहिलं. लक्ष्मी’ माझ्या जीवाचं काहीही होऊ दे बाळाचा जीव वाचला पाहिजे’. सुप्रियानी देवाला विनवणी केली.
तिच्यासाठी धावली असं वाटलं. दोघीही सुखरूप होत्या . सूप्रियाच्या आईने दत्तप्रभू जवळ नक्कीच काही बाही नवस बोलली असेल , खात्री आहे.
दोन-तीन दिवसाच्या जागरणानंतर थकून त्यादिवशी सुप्रियाला झोप लागली . पहिलं बाळ…. पहिला भयंकर मधून सुखद अनुभव .
पहिलं बाळांतपण माहेरी. तब्बल दोन महिने राहिली. सासू-सासर्यांना आता बाळाची ओढ लागली . त्यांच्याकडे जाणं गरजेचं होतं . नांदेडला सासूबाईंनी थाटात बारसं केलं. शाल्वी नाव ठेवलं. नंतर शाल्वी आणि सुप्रिया माधव कडे लातूरला रवाना झाल्या . मधल्या काळात माधवशी धड बोलणं पण झालं नव्हतं . माधवची कंपनीच्या कामासाठी फार ओढाताण चालली होती. नोकरी टिकवणे गरजेचे होतं.
खाण्यापिण्याचे हाल झाल्याने तब्येत खूप उतरली होती. शाल्वी चार वर्षाची होईपर्यंत लातूरलाच होते.
खर्च वाढले पण पगार नाही,
शाल्वीच्या बाललीलांमध्ये दिवस सरत होते. सणावाराला अधून मधून नांदेडला भेट होत होती. कधी सासू-सासरे बाळाच्या ओढीने लातूरला येत. सुप्रियाची संसारातली काटकसर माधवची धावपळ त्यातून सुखी समाधानी संसार करण्याचा प्रयत्न त्यांच्या नजरेखालून जात होता.
शाल्वी साडेतीन वर्षाची झाली. तिला बालवाडीत घातलं. सुप्रिया पासून थोडी थोडी वेगळी राहिली तर सुप्रिया चा पण घर खर्चात हातभार लावायचा विचार होता.
पण…..
पण सासूबाई तिला दुसरा चान्स घेण्यासाठी भेटी परत म्हणत होत्या . सध्याची ओढाताण बघता दुसऱ्या अपत्याचा विचार करावा की नाही ? असं सुप्रियाचे मन सांगत होतं.
पण असं होणार नव्हतच. सासूबाई जिंकल्या.
सुप्रियाला दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. कुटुंबाच्या त्रिकोणाचा आता चौकोन होणार. मुलगा की मुलगी ? माहित नाही.
पण माधवला आता नोकरीतील पगार वाढीची आवश्यकता होती. ज्याची तो वाट बघत होता. आपण काही करू शकत नाही याची सुप्रियाला खंत वाटायची.
संसार रगाड्यात पूर्वी तिने कधी कथा कविता रचल्या याचाही विसर पडला . पहिल्या वेळेस डोहाळे पुरवण्याकडे माधव जातीने लक्ष देत होता आता त्याला आणि सुप्रियालाही या गोष्टीसाठी वेगळा वेळच नव्हता .
माधवने कंपनी स्विच करण्याचा निर्णय घेतला. लातूर सोडून औरंगाबादला.
सासू-सासऱ्यांचे यावेळेस लातूरला जास्त वेळ राहणं झालं. शाल्वी कडे लक्ष द्यायला, तीची आबाळ होऊ नये म्हणून.
पहाता पहाता सात महिने झाले .
‘ यावेळेस ची डिलिव्हरी नांदेडला करणार ‘ सासूबाईंनी जाहीर केलं.
बाळांतपण आणि औरंगाबाद शिफ्टींग एकाच वेळी आले. त्याआधी म्हणजे आठव्या महिन्यात सुप्रियाने सामान सगळं पॅकिंग करून एका छोट्या खोलीत हलवलं आणि राहत भाड्याचं घर सोडलं. विनाकारण अगाऊचा भाडे खर्च नको. आता सुप्रिया नांदेडला तर माधव औरंगाबादला राहणार. नांदेडला ती अगदीच आराम करत नव्हती . घरातली जशी जमेल तेवढी कामे उरकत असे. दिवस भरत आले होते.
एक दिवस तिला दुपारपासून प्रसुती कळा सुरू झाल्या. संध्याकाळपर्यंत वाढल्या. अशातच तिनी जेवणाची तयारी करून सासू-सासर्यांना वरण-भात करून वाढला. दवाखान्यात न्यायची वेळ आली. येणाऱ्या जीवाला तिच्या कळा बघवल्या नसतील, लगेच बाळाने रडून आपण आल्याची वर्दी दिली .
माय झाली सरस्वती
जणु सुप्रियाच्या अर्ध्या कळा तिनेच घेतल्या आणि धीर दिला.
जीव कासावीस झाला तिचा.
नर्सच्या हातातल्या बाळाचा चेहरा बघून सुप्रियानी ओळखलं दुसऱ्यांदा मुलगी झाली.
वाटलं आता सारेच नाराज होणार.
सुप्रियाच्या डिलिव्हरीच्या आधीच माधव तिच्याजवळ आला होता. त्याने घरी निरोप पाठवला ‘सरस्वती ‘
सुप्रियाचा जीव कोड्यात होता.
काय म्हणतील ते ? नाराज की खुश ?
वाचूया पुढील भागात.
क्रमशः
……… मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.






खूप छान लेखन मिस असं वाटत आहे कुठली तरी वेबसिरिस पाहत आहे.