१०- हरवून गेल्या जाणिवा..
वैकुंठाचे लग्न-कथामालिका
दर्शना भुरे..
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पार पडला..
दुसऱ्या दिवशी पहाटे वैकुंठा तिच्या आवडत्या झुल्यावर बसून आरामात चहा पित होती.. घरातील पाहुण्यांची वर्दळ हळूहळू कमी होऊ लागल्याने घर हळूहळू रिकामे होऊ लागले. त्यातून प्रमिलाही आईसोबत आज तिच्या गावाकडे जाणार होती म्हणून वैकुंठा ला अजिबात करमत नव्हते..
प्रमिलाची आणि तिची काही दिवसांपूर्वीची ओळख पण त्या अवघ्या काही दिवसातच दोघी एकमेकींच्या घट्ट मैत्रीणी बनल्या होत्या.. राधा पण सर्वांचा निरोप घेऊन गावाला गेली होती. पण जाताना ती का कोणास ठाऊक रत्नाआत्याच्या आणि तिच्या आई अप्पांच्या गळ्यात पडून खूप रडत होती..विनायकही तिची पाठवणी करताना हळवा झालेला दिसत होता.कोणी गावाला जाताना इतके कसे रडू शकते..
राधाला असे एवढे रडताना पाहून वैकुंठाला हसू फुटत होते. ती हसतच रत्नाआत्याला म्हणाली,
आत्याबाई कोणी दुसऱ्या गावाला जाताना एवढे रडते का? राधाताई वेडी आहे का गावाला जाताना रडत आहे. मी नाही रडत राधाताईसारखी मला तर खूप आनंद होतो गावाला जाताना..
मस्त बैलगाडीची छुमछुम, पळणारी झाडे, डोंगर, नद्या, छोट्या छोट्या पायवाटा बघायला तर खूप मजा येते..
पण आबा आणि आई मला कधीच जावू देत नाही.
वैकुंठाच्या या बालीश बोलण्यावर आपण काय उत्तर द्यावे.. हे रत्नाआत्याला समजत नव्हते त्यामुळे ती वैकुंठाकडे बघून नुसतीच हसली.. आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करु लागली..खरचं किती बालीश आहे वैकु .. अवघी नऊ वर्षाची पोर सासर वगैरे तिला काय कळणार ..
आणि तो काळही वेगळाच होता.. बालपणीच मुलींची लग्न लावून देण्याचा आणि मुलगी वयात आल्यावर सासरी पाठवण्याचा..
वैकुंठा घरात सर्व बहिणींत मोठी असल्याने घरात सर्वात आधी तिचे लग्न होणार होते त्यामुळे या सर्व गोष्टी वैकुंठाला माहित नव्हत्या आणि कळतही नव्हत्या.
वैकुंठाचा चहा संपला.घाईघाईने तिने कप आत आणून ठेवला आणि परत झुला झुलायला गेली.
एकेक करुन विनायक,त्याचे आई-बाबा सोडून सगळी पाहूणेमंडळी गेली.
विन्या इथेच राहणार का आई?
वैकुंठाने तिच्या आईला विचारले.
वैकुंठा असे बोलू नये.तू आता मोठी होत आहेस बरे.
हं.. असे म्हणत..
वैकुंठा अंगणात येऊन प्रमिलासोबत खेळत बसली.
प्रमिला बघ मी बाहूली आणली.आपण भातूकली खेळू या..
अग पण बाहूला नाही ना खेळायला.
काही नाही होत.माझी बाहूली एकटीच घर मांडेल.
वेडाबाई बाहुल्याशिवाय तुझी बाहूली एकटी कशी राहील?
दोघी बोलत असतांनाच विनायकचे बाबा वैकुंठाच्या बाबांसोबत बोलायचे म्हणून बाहेर अंगणात आले ..
आणि दोघींना म्हणाले,
वैकुंठा,प्रमिला तुम्ही दोघी आत जा बघू..
वैकुंठा अनिच्छेनेच प्रमिलासोबत आत निघून गेली.
विनायकच्या वडीलांना अंगणातील खुर्चीवर बसायला सांगून त्यांच्या शेजारी बसत मधुकर राव म्हणाले,
हं बोला पाहुणे काय म्हणता.. काय काम काम काढले माझ्यासाठी..
विनायकचे वडील सरळसरळ मुद्द्याला हात घालत म्हणाले,
विनायक -वैकुठाची जोडी कशी वाटेल..
म्हणजे..
म्हणजे तुमची वैकुठा आम्हाला आमच्या विनायकसाठी पसंत आहे..
तेव्हा तुमचा विचार आम्हाला कळला तर बरे होईल..
मधुकररावांनी वैकुंठाच्या लग्नाचा अजून विचारच केला नव्हता.
पाहुणे…आम्हालाही तुमचा विनायक पसंत आहे पणआमची वैकुंठा लहान आहे अजून.
शिवाय तिला समजही कमी आहे.
आणि वैकुंठाच्या आईलाही विचारावे लागेल.
मी आणि विनायकच्या आईने तुमची दोघांची संमती असेल तर आज वैकुंठाला कुंकू लावून सोयरीक पक्की करून ठेवायचा विचार केला.विनायकचे वडील म्हणाले.
मला ही जोडी पसंत आहे. पण आमची वैकु अजून लहान आहे शिवाय अल्लडही तेव्हा.. वैकुंठाची आई त्यांना चहाचे कप देत म्हणाली,
वैकुंठाच्या लग्नाच्या कल्पनेनेही तिच्या डोळ्यात आलेले पाणी मधुकररावांच्या नजरेतून सुटले नाही.
अहो वहिनी आपण फक्त तूर्तास सोयरीक पक्की करू आणि लग्न वर्षभराने.आणि सगळ्या मुलींचे लग्न या वयात होतच आहेत.
बघा तुमची काही हरकत नसेल तर.
तुमच्या होकाराची वाट बघतो.. असे म्हणत विनायकचे बाबा त्या दोघांचा निरोप घेत जागेवरून उठले.
क्रमशः
विनायक-वैकुंठाचे लग्न होते का…वाचा पुढील भागात.
कथामालिका कशी वाटत आहे?
Comment मधून अवश्य कळवा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा






Chhan
Sundar
खूप सुंदर कथामालिका
Mast