*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या* *’राष्ट्रवंदना ‘ या गीताचे रसग्रहण…..*
भारतीय स्वातंत्र्याच्या उमेदीच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला.खरेतर भारत वर्षाला पडलेले हे सुंदर स्वप्न म्हणावे लागेल. आपल्या वचन, भजन आणि काव्यांतून कीर्तनाच्या माध्यमातून संबंध मानवजातीला बंधुत्व, प्रेम, राष्ट्रभावना,अंधश्रद्धा यावर कडाडून टीका केली आहे.
देशसेवा,देशभक्ती, राष्ट्रप्रेम म्हणजे काय?असा प्रश्न निर्माण होत आहे. व्याख्या सोयीस्कर करावी, की सर्वंकष करावी. याचा विचार करण्याची गरज वाटते. कोणत्याही बाबतीत कमालीचा अट्टाहास केला की काय लागते हाताला?म्हणून तो सर्वंकष असावा. हा मध्यममार्ग संतांनी अंगीकारले. ” राष्ट्राची ओळख ही साधन संपत्तीने नाही, तर लोकांमुळे होते.” मानवधन महत्त्वाचे ठरते. तो तन-मन-धनाने सुखी समाधानी असायला हवा. प्रत्येकाने मायभूमी, मायभाषा आणि देशहिताच्या दृष्टीने आपला देह झिजवला पाहिजे.
शांत रसात्म नंदादीपासारखी सतत तेवत्या शब्दकळेचा साज हे काव्याचे वैशिष्ट्य आहे. वीर रसात्म शब्दात राष्ट्र जागरण होते. या विचारा पलीकडे जावून देशभक्ती फुलवली आहे. देशाच्या धगधगत्या सीमा चालतील, परंतु अंतर्गत कलह भयानक असतो. तो निकोप करण्यासाठी प्रयत्न केला तर शांती, समाधान, भयमुक्त जीवनाचे शिल्पकार व्हावे, असे कवींना वाटते.
भारत भूभागाला मानव समजून तो सशक्त झाला पाहिजे. तनमनधन म्हणजे शरीर, मन आणि संपन्नता यावी. सर्व धर्म, जाती, पंथ हे देहाचे अवयव समजून सर्वांप्रती प्रेम भावना जागृत झाली पाहिजे. तरच आपण सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत आपण विजयी होवू. यामुळे जागतिक पातळीवर आपण विजयी होवू. परंतु आज मितीला काही वेगळी भूमिका नागरिक घेताना दिसतात. यात कोणती भावना दिसते. म्हणून मला ही त्रिकालाबाधित सत्य कथन करणारी कविता मला वाटते.
स्त्रीपुरुष हेच राष्ट्रीचे शिल्पकार आहेत. परंतु माती ही मखरात बसवलेली देवी आहे.ती निर्भय झाली पाहिजे. तरच ती तिच्या लेकरांना सत्य, शील, असणारे निर्मळ मनाचे ,धाडसी वीर जन्माला घालील. अशा सद्गुणी माताच,सद्गुणी, चारित्र्यवान जनता देशाच्या प्रगतीसाठी पुढे येतील. कोणी रंक, राव, पंडित वा भिकारी असा कुठलाच भाव रयतेच्या मनात येणार नाही. तरच देश विजयी होईल. अशा निर्व्याज प्रेम करणाऱ्या लोकांची वाण भासणार नाही.
अर्थात सर्व मानव जातीच्या कल्याणात देशहित असते. याचाही विचार करणे हीच तर देशभक्ती असते. यावरचा विश्वास दृढ करणारी ही काव्य रचना आहे.
देश विकलांग करणाऱ्या रुढी, परंपरेचे, प्रथांचे समूळ उच्चाटन झाले तरच आपल्या ज्ञातीबांधवासोबतचे वर्तन कल्याणाचे होईल. स्पृश्य- अस्पृश्यता ही मनाला लागलेली कीड आहे. कलंक आहे. यामुळे अपरिमित हानी भारतीय लोकांनी केली आहे. तो कलंक मिटवण्यासाठी आपण पुढे होऊया. मनात कर्तव्याची सणक, बुध्दीत, भावनेत सदाचार, शीलवान होऊन उद्योगी होऊन, देशाचे धन वाढवले पाहिजे. असा मौलीक संदेश काव्य देते. विश्वास प्रत्येक नागरिकांना वाटावा. नेतृत्व आणि नेत्यांवर विश्वास असायला हवा. माथा टेकवायला तितकेच आदराचे चरण असावे लागतात. सद्या ते दिसत नाहीत. हे आत्मकेंद्रित अवस्थेमुळे भारतीय मनात अनास्था निर्माण होते आहे. ते बळ राष्ट्रीय चारित्र्यावर अवलंबून असते. ते चारित्र्य निर्माण करणे, म्हणजे देशभक्ती होय. तुमच्या लेकरांच्या मनात शक्तीभक्तीतीची भावना निर्माण होते. ज्ञानार्जन, श्रद्धा या दैवी गुणांची पेरणी प्रत्येक घराघरात होईल. मग राष्ट्रीय भावनेला प्राधान्यक्रम हा जीवनाचा अविभाज्य भाग बनायला वेळ लागणार नाही. प्रत्येक नागरिक सिपाही होईल. म्हणजे छत्रपतींच्या मावळ्यांच्या लढवय्या वृत्तीचा साक्षात्कार आल्यावाचून राहणार नाही. जागतिक पातळीवर आपल्या राष्ट्रीय चारित्र्याने लोक दिपून जातील. नैतिक दबदबा निर्माण होईल.
म्हणून तुकड्या निर्मिकाला उद्देशून मला लोकजागृतीचे बळ दे, देव, धर्म अन् देशासाठी ,नाही तर फक्त आणि फक्त देशासाठी प्राण हाती घेयाचे बळ दे! ते माझ्या भक्तींचे फळ असावे. विवेकाच्या तराजूत सत्य तोलण्याचे सामर्थ्य हीच तर देशभक्ती असते.
अत्यंत महत्त्वाची राष्ट्रवंदना तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे. हातात शस्त्रास्त्रे घेऊन लढून गनीमांना पळवता येते. मनीचा गनीम कसा पळवता येईल? अंतर्गत कलहाचे काय? जातीधर्म,उच्चनीच,गरीबश्रीमंत, काळागोरा, स्पृश्यअस्पृश्य हे प्रत्येक भारतीय जनतेच्या मनातील गनीम आहेत. त्याचा वध केला की राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होईल.यावर प्रचंड विश्वास महाराजांनी व्यक्त केला आहे.
सद्यस्थितीत मला अत्यंत महत्त्वाची रचना वाटते. करण आज मूल्यांची पडझड झालेली दिसून येते. कोणत्याही हितापेक्षा देशहितासाठी जनतेने जागृत असावे, ही भावना शांत रसाच्या अनुभूतीतून प्रकट झालेली आहे.
चंद्रकांत गायकवाड
मुखेड.









खुप छान