वंद्य वन्दे मातरम् !देशभक्तीगीत रसग्रहण
वंद्य वन्दे मातरम् !देशभक्तीगीत रसग्रहण

वंद्य वन्दे मातरम् !देशभक्तीगीत रसग्रहण

 

मराठी साहित्यविश्वातील विख्यात कवी,गीतकार,पटकथा व संवादलेखक ,आधुनिक युगाचे वाल्मिकी गजानन दिगंबर
माडगूळकर यांच्या “चैत्रबन”
या काव्यसंग्रहातील ही कविता असून यामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी वीर पुत्रांनी हौतात्म्य पत्करलेले, त्या मायभूमीच्या सुपुत्राविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे गीत आहे.’वन्दे मातरम्’ हा मंत्रच जणू स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना प्रचंड ताकद मिळवून देण्यास कारणीभूत ठरला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.भारतीयांच्या दृष्टीने या मंत्राचे मोल अनमोल आहेत.

वेद मंत्राहून आम्हां
‘ वंद्य वन्दे मातरम्’ !

ज्याप्रमाणे वेदांमधील मंत्र पावित्र्य ,जगण्याचा मार्ग,प्रेरणा देतात त्याप्रमाणे ‘वंदे मातरम्’
हा मंत्र देखील भारतीयांसाठी खूप मोठे महत्त्वाचे कार्य करतो.वेद जसे भारतीयांना वंदनीय तसाच हा ‘वन्दे मातरम्’
हा मंत्र सुद्धा भारतीयांना वंदनीयच आहे.

माऊलीच्या मुक्ततेचा
यज्ञ झाला भारती
त्यांत लाखो वीर देती
जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला
मंत्र ‘ वन्दे मातरम्’ !

ज्याप्रमाणे आपली दु:ख ,संकटं,अडचणी दूर होण्यासाठी यज्ञामध्ये विविध प्रकारच्या आहुती देतात त्याप्रमाणे भारतमातेच्या स्वातंत्र्याकरीता (इथे भारतमातेला ‘माऊली’ असे संबोधले आहे.) आमच्या माऊलींच्या स्वातंत्र्याकरीता युद्धामध्ये अनेक लाखो वीर आपल्या प्राणांची आहुती देत आहेत.’वंदे मातरम्’ या मंत्राला या आहुती मुळेच पावित्र्यता प्राप्त झाली आहे.

याच मंत्राने मृतांचे
राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी
शांति वादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभो
शस्त्र ‘वन्दे मातरम्’

गुलामगिरीच्या जोखडामध्ये अडकलेले ,पारतंत्र्यात मृतावस्थेत असलेले हे आपले
सारे राष्ट्र जणू काही या मंत्रामुळे खडबडून जागे झाले आहे.युध्दामध्ये आधुनिक शस्त्रांनी सज्ज असणा-या क्रूर शत्रूशी मोठ्या धैर्याने ,मोठ्या सामर्थ्याने लढले.त्यासाठी शस्त्रहीन भारतीयांना ‘वन्दे मातरम्’ नावाचे शस्त्र हाती लाभले.या शस्त्राच्याच बळावर त्यांनी परकीय सत्तेविरूद्ध लढा दिला.

निर्मिला हा मंत्र ज्यांनी,
आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले
स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे
गीत ‘वन्दे मातरम्’ !

आपले स्वातंत्र्य सैनिकच ‘वन्दे मातरम्’ या मंत्राला मंत्राचे स्वरूप देणारे होते.त्यांनी प्रचंड
संघर्ष करून हा मंत्र प्रत्यक्षात
आचरणात आणला.म्हणूनच त्या सर्व महात्म्यांच्या हौतात्म्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये त्यांचे स्थान स्वर्गलोकातील परमेश्वराच्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या हुतात्म्यांच्या स्मरणासाठी आणि त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांसाठी त्यांच्या आरतीचे ‘वन्दे मातरम्’ हे गुणगान गाऊ या असे ग.दि.मा आपल्या ह्या गीतात म्हणत आहेत. आज खरे तर या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आपण सारे मोकळेपणाने श्वास घेत आहोत.त्या महान व्यक्तींविषयी
कृतज्ञता व्यक्त करावी हाच या गीतामागचा मूळ हेतू आहे.
    अशाप्रकारे,वन्दे मातरम् या चित्रपटातील हे अजरामर असे गीत असून ग.दि.मा.,पु.ल.देशपाडे व बाबूजी अर्थात सुधीर फडके हे तिघे जण या चित्रपटात एकत्र आले  व या चित्रपटाचे निर्माते मनशक्ती केंद्र, लोणावळा संस्थापक स्वामी विज्ञानानंद आहेत.तसेच,’वन्दे मातरम्’ या मंत्राचा उगम इ.स.१९८२ मध्ये बकिमचंद्र चॅटर्जी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणा म्हणून लिहिलेल्या स्फूर्तीदायी यात हा शब्द सापडतो.ही स्फूर्तीची लाट,हा उत्साह भारतीयांमध्ये अखंड निर्माण व्हावा ह्या विचारसरणीसाठी हे गीत नक्कीच प्रेरणादायी ठरते.आपल्या भूमातेपुढे नतमस्तक होऊन उच्चारले जाणारे हे शब्द मंत्राप्रमाणे तेवढेच पवित्र व वंदनीय आहे.
सौ.तेजश्री कुलकर्णी
ठाणे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!